Views: 356
कल्याण : फेरीवाला धोरणाची अमलबजावणी करण्यासाठी आणि फेरीवाल्यांच्या इतर अनेक प्रश्नांबाबत महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाच्या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त स्वाती देशपांडे यांची भेट घेतली. फेरीवाल्यांच्या समस्यांबाबत काही दिवसांपूर्वी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता त्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन उपायुक्तांच्या दालनात करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महंमद शेख, राज्य संघटक आबासाहेब चव्हाण, मुबंई प्रदेश अध्यक्ष आबासाहेब शिंदे, कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष महेश भोईर, कल्याण डोंबिवली महिला आघाडी शहर अध्यक्षा मनिषा टाकळकर, अहमद शेख, नितीन टाकळकर, अतिक शेख, महिंद्र सावंत, सलिम शेख, गुड्डू, सागर चरणपहाडी आदी फेरिवाला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत राष्ट्रीय फेरीवाला कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी आणि सर्व पथारीधारक आणि फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी सुरक्षीत झोन म्हणून रुपसंगम साडी सेंटर ते एपीएमसी मार्केट समोरील नाल्यावर मजबूत स्लॅब (आरसीसी कॉकीट) टाकून या ठिकाणी व्यापारी गाळे सोयीसुविधायुक्त तयार करुन पुनर्वसन त्याजीगी करुन नाममात्र शुल्क निश्चित करावे. तसेच फेरीवाल्यांना व्यवसायिक प्रशिक्षण देवून विमा, पेन्शन सारख्या सामाजिक सुरक्षा द्यावी.
कल्याण डोंबीवली महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील फेरीवाला पथारी धोरण दिनांक ५/०३/२०१४ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक १९/०९/२०१३ आणि नगर विकास खात्याचे विविध निर्णय जाहिर करुनही आपल्या अधिपत्याखालील राष्ट्रीय फेरीवाला समिती गठीत करण्याकामी सहायक कामगार आयुक्त आणि आपल्या मार्फत पथारीधारकांच्या निवडणूका घेतल्या जात नाहीत त्या निवडणूका तात्काळ घेण्यात याव्यात. त्यामध्ये ३० टक्के महिलांना समाविष्ट करुन आणि सामाजिक आरक्षणाच्या तत्वावर राष्ट्रीय पथारी धोरणानुसार कुठल्याही पथारीधारकास रहदारीचे कारण दाखवून त्यांचा जगण्याचा अधिकार मारु नये आदी विषयावर चर्चा करण्यात आली.



