Views: 541
कल्याण : कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी समाज बांधवांचे स्वप्न असणाऱ्या आगरी कोळी आणि वारकरी भवनाचे येत्या बुधवारी भूमिपूजन होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. भूमिपूजन सोहळा समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी यांनी ही माहिती दिली.
ठाणे जिल्ह्यात एक सुसज्ज आणि बहुद्देशीय आगरी कोळी आणि वारकरी भवन असावे अशी समाज बांधवांची गेल्या अनेक वर्षांची इच्छा होती. त्याला लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होत असल्याने आगरी कोळी आणि वारकरी समाजामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर हे भवन प्रत्यक्षात येण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सिंहाचा वाटा असल्याची झाल्याची प्रतिक्रिया भूमिपूजन सोहळा समितीचे सदस्य आणि ठामपाचे उपमहापौर रमाकांत मढवी यांनी यावेळी दिली.
तर अशा प्रकारचे हे पहिलेच आगरी कोळी आणि वारकरी भवन असून त्याद्वारे आगरी कोळी समाजाचा इतिहास आणि संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. समाजाच्या संस्कृती आणि परंपरांचे दर्शन होण्यासाठी याठिकाणी एक स्वतंत्र दालन असेल अशी माहिती त्यासोबतच या भवनाच्या माध्यमातून युवासेनेचे प्रदेश सचिव दिपेश म्हात्रे यांनी यावेळी दिली.
तर आगरी कोळी समाजाचे एक मोठे स्वप्न प्रत्यक्षात येत असल्याने या भूमिपूजन सोहळ्याच्या ठिकाणी हजारो वारकरी हरिपाठ संकीर्तन करणार आहेत. ज्यामध्ये टाळ आणि मृदुंगाच्या गजरात हजारो वारकरी सज्ज राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तर हे भवन प्रत्यक्षात येत असल्याने पत्रकार परिषदेला उपस्थित वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार मानण्यात आले.
या पत्रकार परिषदेला शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, तालुका प्रमुख महेश पाटील, संघर्ष समितीचे गुलाब वझे, अर्जुन पाटील, जयेश महाराज भाग्यवंत, गणेश महाराज ठाकूर, शरद पाटील, नितेश ठोंबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



