कल्याण : राष्ट्र सेवा दल, कल्याण डोंबिवली केंद्राचे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली, येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी “व्यसनमुक्ती – मोबाईल” या विषयावर मार्गदर्शन केले.
मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शनात कॉडलेस उपकरणांमधून निघणारी विद्युत चुंबकीय प्रारणे मानवी आरोग्यासाठी घातक असतात. मोबाईल शरीराच्या जितका जवळ तितका त्याचा धोका अधिक असतो. रक्ताचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, हृदय विकार, ब्रेन ट्युमर यांसारख्या घातक आजाराबरोबरच कानाचे विकार, डोकेदुखी असे अनेक विकार जडतात. अपुऱ्या प्रकाशात मोबाईलवर चॅटिंग केल्याने दृष्टी गमावण्याची शक्यता अधिक असते.
बिछान्यावर पडल्या पडल्या अंधारात मोबाईलवर व्हॉट्सॲप आणि फेसबुकचे अपडेट पाहणे दृष्टी कमजोर होण्यास निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे अंधारात मोबाईल बघू नये, मोबाईलवर बोलताना स्पीकर चा वापर करा, झोपताना फोन उशाशेजारी ठेवू नका, शक्यतो लहान मुलांच्या हाती मोबाईल देऊ नका, आंघोळीनंतर अंग ओले असताना मोबाईल वापरणे टाळा. मोबाईलचा अतिवापर आणि मानवीवस्तीत असलेल्या मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय प्रारणांमुळे आगामी दहा वर्षांत देशात कर्करोगाची त्सुनामी येईल. त्यामुळे आत्ताच मोबाइलचा कमीत कमी वापर करण्यावर भर द्यावा, असे कळकळीचे आवाहन नशाबंदी मंडळाचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी केले.
यावेळी राष्ट्र सेवा दल मधील सहकारी सुहास कोते, विनय ताटके, मिलिंद गायकवाड, विशाल जाधव, रवि घुले, सबुरी पांचाळ, कौस्तुब, रजत पुजारी, विनायक मरकडे व राष्ट्र सेवा दल मधील ६० युवकांनी सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रमाची सांगता व्यसनमुक्तीची शपथ घेऊन करण्यात आली.



