Views: 279कल्याण : कल्याणातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक व सिद्धहस्त कवी आणि लेखक रवींद्र लाखे हे त्यांचे वडील कै. दामोदर श्रीनिवास लाखे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कल्याणातील नवोदित कवी, लेखक यांना दामोदर श्रीनिवास लाखे स्मृती नवोदित साहित्यिक पुरस्कार देत असतात. यंदा या पुरस्काराचे तिसरे वर्ष असून सन २०२५ चा हा पुरस्कार कल्याणतील नवोदित लेखक पो उप निरीक्षक अर्जुन डोमाडे यांच्या डिम्पल पब्लिकेशन प्रकाशीत भितुर या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे.
यापूर्वी हा पुरस्कार कथाकार स्वप्निल चव्हाण, कवी अजित अभंग यांना देण्यात आला आहे. रोख रुपये 11 हजार आणि प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून कोणताही जाहीर कार्यक्रम न करता हार, तुरे मोमेंटो, प्रमुख पाहुणे टाळून थेट रोख 11 हजार रुपये नवोदित लेखकाच्या खात्यात भरले जातात. रवींद्र लाखे यांनी सुरू केलेला हा पुरस्कार म्हणजे त्यांचे वडील दामोदर श्रीनिवास लाखे यांच्या स्मृति जागृत ठेवून त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करणे आणि नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देणे असा दुहेरी हेतूने प्रेरित असून रवींद्र लाखे यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व थरातून कौतुक होत आहे. अर्जुन डोमाडे हे पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असून अशी ड्युटी करून लेखन करणे कठीण आहे, त्यामुळे ते यापेक्षा अधिक कौतुकास पात्र आहे असे रवींद्र लाखे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले असून या पुरस्काराबद्दल अर्जुन डोमाडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

