Views: 374
कल्याण : आषाढी अमावस्याला घरोघरी दीपपूजन केले जात असताना त्याचे वैज्ञानिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा अभिनव प्रयत्न जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे करण्यात आला.
यावेळी अश्मयुगात दोन दगड एकामेकावर घासल्याने आगीचा शोध लागल्यानंतर माणसाच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला हे विद्यार्थ्यांना कथेच्यारूपात संध्या जगताप या शिक्षिकेने मांडला. दीपक पूजनाच्या कार्यक्रमाची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांची होती. यावेळी चित्रा पाटील, रसिका पाटील, अनघा दळवी या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने दिव्यांची आरास केली. पानाफुलांच्या रांगोळ्या काढून दिव्यांनी त्या सजवण्यात आल्या.
अजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की संस्कृतिक सण, समारंभ म्हणजेच एक आनंदाचा ठेवा असून तो आपण जतन केला पाहिजे. अनघा दळवी यांनी वैज्ञानिक व सकारात्मक विचार पुढच्या पिढीसमोर जायला पाहिजे म्हणूनच हा कार्यक्रम शाळेत घेतला असे सांगितले. आषाढ अमावस्येचे औचित्य साधत जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे दीप पूजनात समई, निरंजन, पणती, पंचारती, कापूर आरती, धुपारती, मेणबत्ती, मातीचे दिवे मांडण्यात आले होते. यावेळी मुलांकडून शुभंकरोती कल्याणम अशा पद्धतीच्या प्रार्थनाही चित्रा पाटील, संध्या जगताप यांनी म्हणून घेतल्या. दिव्यांच्या प्रकाशाने राहनाळ शाळा उजळून निघाली होती.



