Views: 181कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी आणि प्रेरणादायी इतिहास प्रत्येकाला माहीत असायलाच हवा. तोच इतिहास जर लहान वयात विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला जात असेल, तर ती अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय वाघ यांनी केले. जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथे सलग १८ दिवस चालणाऱ्या शिवचरित्र पारायण उपक्रमात सहभाग प्रसंगी ते बोलत होते. २ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचे हे सहावे वर्ष असून, शाळेने सातत्याने राबवलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पहिल्याच दिवशी अंकुश ठाकरे यांनी शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र ही कथा सांगितली, तर अजय पाटील यांनी संतांची कामगिरी विशद केली. राजश्री पाटील यांनी भोसले घराण्याचा पराक्रम, नीलिमा अंधेरे यांनी शिवरायांचे बालपण, संगीता पाटील यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, अंकुश ठाकरे यांनी स्वराज्याचे तोरण बांधले, तर रसिका पाटील यांनी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त ही प्रेरणादायी कथा विद्यार्थ्यांसमोर मांडली. या १८ दिवसांच्या शिवचरित्र पारायणात इयत्ता पहिली ते सातवीचे सुमारे २६० – २७० विद्यार्थी दररोज सहभागी होत असून, विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राबद्दल विशेष आवड व ओढ निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असेही डॉ. वाघ यांनी सांगितले.
या उपक्रमाला गावचे उपसरपंच प्रताप पाटील, ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रजनी नाईक, उपाध्यक्षा अंकिता कडू, तसेच सदस्य ईशा चव्हाण, रेश्मा झुंजारराव, कमल शिंदे यांची उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे दररोज १५ ते २० महिला पालक आवर्जून उपस्थित राहत असून, हा उपक्रम लोकसहभागातून अधिक समृद्ध होत आहे. रविवार असूनही विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित चित्र काढून दिवस उत्साहात साजरा केला. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
“विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच शिवरायांचा इतिहास कळावा, त्यांच्या कर्तृत्वातून संस्कार घडावेत, या उद्देशाने हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने राबवला जात आहे,” असे या उपक्रमाचे संकल्पक व शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी सांगितले.


