Views: 466
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी
कल्याण : मी कल्याणकर सामाजिक संस्थेने कसारा घाटातील भीषण पाणीटंचाई असलेल्या बिवल वाडी गाव जो पर्यंत पाणीटंचाई मुक्त होत नाही तोपर्यंत हे गाव दत्तक घेतलेले आहे. या गावातील लोकांना बाराही महिने पाणी मिळावे, त्यांच्या विहरीचे बंद झालेले पाण्याचे झरे पुन्हा जिवंत व्हावे व विहरीमधील पाणी वर डोंगरावर असलेल्या पाण्याच्या टाकी पर्यंत पोहचावे म्हणून संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न चालू आहेत. या गावच्या पाणी टंचाई बाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याठिकाणचा पाहणी दौरा केला.
येथील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी अनेक लोकांच्या सहकार्याने श्रमदान करून गॅबियन बंधारे बांधणे. जैविक शुध्दीकरण पद्धतीने बायो कॅटलीस ईको चीपचा वापर करणे. पावसाचे पाणी जमिनीत मुरावे म्हणून चर मारणे. रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे या कामाचा शुभारंभ जलतज्ञ गुणवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथे राहणाऱ्या चांदवडकर मावशी यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करता या आदिवासी लोकांची पाण्याची तहान भागेल म्हणून आज ३ टँकर पाणी या विहरी मध्ये सोडले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली इतिहास कालीन विहीर व वर डोंगरावर असलेल्या कसारा घाटातील बिवळवाडी गावातील पाणीसमस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी दौरा केला. तेथे मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे चालू असलेले काम बघून त्यांनी समाधान व्यक्त केले व संस्थेचे कौतुक केले. जैविक शुध्दीकरण पद्धत समजून घेण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी बोलून मंत्रालयात भेटायला येण्यास सांगितले.
या कामासाठी खासदार श्रीकांत शिंदे व मनसे आमदार राजु पाटील यांनी केलेल्या मदती संदर्भात देखील पर्यावरण मंत्र्यांना माहिती देण्यात आली.
मुकेश झा व मुरलीधर पणीकर यांनी देखील या गावासाठी मदत केली असून श्रमदान करण्यासाठी कल्याण मधून आर. पी. आय. चे अण्णा रोकडे, माजी नगरसेवक कैलास शिंदे व त्यांचे सहकारी, उमेश बोरगावकर, कामेश जाधव, केतन रोकडे, विवेक जगताप, उदय कांबळे, रमेश खराटे,बाळू साठे, संजय ठाणगे, निखिल शिर्के, सुदर्शन चिकने, सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले, राजू तिवारी, चेतन नायडू, योगेश बारसकर, बंटी तरे, मुकेश झा, प्रकाश तिवारी, जितेंद्र तिवारी, चीलेंद्र नलावडे, दिलीप पाटील, पंकज निकम, तनय निकम, प्रशांत मोरे आदी सहकाऱ्यांनी या भीषण पाणीटंचाई असलेल्या लोकांना पाणी मिळावे म्हणून भर उन्हात काम केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी दिली.



