Views: 385
कल्याण : २० ऑगस्ट हा दिवस देशभर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वैज्ञानिक दृष्टीकोन दिन म्हणून साजरा केला जातो. शहाड येथील सेंच्युरी रेयॉन हायस्कूल मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे विज्ञानाच्या विविध प्रयोगांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
शून्याचा शोध, जगाला दिलेली दशमान पद्धतीची देणगी त्याचबरोबरीने खगोलशास्त्रामध्ये असणारा प्रचंड अभ्यास असा भारताला विज्ञान आणि वैज्ञानिकांचा समृद्ध वारसा लाभलेला असतानाही भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास कोणकोणत्या बाबी अडथळा ठरलेल्या यांविषयी ही विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करण्यात आली. आज पर्यंत भारताला विज्ञान क्षेत्रामध्ये फक्त एकच नोबेल पारितोषिक मिळाले आहे याचं काय कारण असू शकेल, वैज्ञानिक शोध भारतामध्ये जास्त का लागले नसावेत या सर्व बाबी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभावामुळे आहेत हे ही विद्यार्थ्यांना संवादातून समजवण्यात आले.
शिक्षणामध्ये प्रश्न विचारण्याला असणारा मज्जाव, घोकंपट्टी पद्धतीने होणारे शिक्षण, पुरुषप्रधान संस्कृती, एकाधिकार शाही या बाबी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या वाढीस मारक ठरलेल्या आहेत. तर्क, अनुमान, विश्लेषण, निरीक्षण, प्रयोग आणि निष्कर्ष या बाबींचा वापर करून आपल्या जीवनातील समस्या सोडवणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन होय. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले व त्यांचं शंकासमाधान करण्यात आलं. याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे किशोर पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम सिंग, उपमुख्याध्यापिका रितू भगत, आणि पर्यवेक्षक आनंद भारद्वाज उपस्थित होते.



