Views: 404
एकाच दिवशी आली १५०० किलो वांगी
कल्याण : मार्गशी्ष महिन्यातला चंपाषष्टीच्या दिवशी जेजुरीला मोठा उत्सव साजरा केला जात असून सर्व भाविक भंडारा खोबऱ्याची तळी भरून उत्सव साजरा करतात. यावेळी नैवेद्य म्हणून बाजरीच्या भाकरीसह कांद्याची पात आणि वांग्याचे भरीत याचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे वांगी या फळभाजीला मोठी मागणी असल्याने कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये मंगळवारी वांग्याची १२०० ते १५०० किलो आवक वाढली असल्याचे कल्याण डोंबिवली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केटिंग इन्चार्ज निवृत्ती चकोर यांनी सांगितले.
चंपाषष्टीच्या दिवशी वांगी आणि कांद्याच्या पतीला विशेष मागणी असते. इतरवेळी वांगीकडे पाहून नाक मुरडणारे देखील आजच्या दिवशी खरेदी करताताना पाह्यला मिळतात. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज विविध जिल्ह्यातून भाजी पाल्यांची आवक होत असते. यामध्ये फळ भाज्या, पालेभाज्या यांचा देखील समावेश असतो. चंपाषष्टी असल्याने नागरिक वांगीची खरेदी करतात. मागणी जास्त असल्याने कल्याणच्या कृषी उत्पन्न समितीमध्ये दररोजपेक्षा १२०० ते १५०० किलो जास्त वांगीची आवक झाली आहे. या दिवशी वांगी सोबत लागणाऱ्या कांद्याच्या पतीची आवक मात्र नेहमी इतकीच आहे. घाऊक बाजारात वांगी ३० ते ३२ रुपये किलो आहे तर कांद्याची पात २० ते २५ रुपये जुडी असल्यचे देखील कृषी उत्पन्न मार्केटिंग इन्चार्ज चकोर यांनी सांगितले.
विक्रीत घट
गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक वाढली आहे. भाज्यांचे दरही कमी झाले आहेत. त्यामुळे मोठी मागणी नसून पहिल्यापेक्षा विक्रीत घट झाल्याचे किरकोळ विक्रेते विशाल खंडागळे यांनी सांगितले. तसेच किरकोळ विक्रेते यांच्याकडे वांगी ४० रुपये किलो तर कांदा पात २५ ते ३० रुपये इतकी आहे.



