Views: 416
कल्याण : सहकार क्षेत्रातील ख्यातनाम असलेली कल्याण जनता सहकारी बँक ५० व्या वर्षात पदार्पण करत असून यानिमित्त सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्ष म्हणून डॉ. सतीश मोढ हे असणार असल्याची माहिती बनके तर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर, एमडी व सीइओ अतुल खिरवडकर, उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर फाटक आदी उपस्थित होते.
कल्याण शहरात कल्याण पीपल्स को. ऑप. हि बँक बुडाली होती. याच पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रातील धुरिण स्व. माधवराव गोडबोले यांच्या प्रेरणेने कल्याण जनता सहकारी बँकेची स्थापना २३ डिसेंबर १९७३ रोजी करण्यात आली. टिळक चौकातील देवधर सदन येथे १८० चौ. फुट जागेत, ११ सदस्य, ५० हजार भागभांडवल, ८० हजारच्या ठेवीने सुरवात झालेली बँक आज ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने बँकेचे सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे आयोजन २३ डिसेंबर २०२२ रोजी अत्रे रंगमंदिर सभागृहात सकाळी ११ वा. करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. तर राष्ट्रीय सेवा संघ कोकण प्रांतचे प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असणार आहे. तसेच केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे उपस्थित असणार आहे.
आतापर्यंत बँकेच्या ४३ शाखा असुन बँकेचा व्यवसाय ५ हजार कोटींच्यावर आहे. नुकतेच आक्टोंबर महिन्यात गुजरात राज्यातील सुरात येथे शाखा सुरु करण्यात आली आहे. बँकेचे ६० हजार सभासद असून ३ लाखापेक्षा जास्त ग्राहक आहेत. स्थापनेपासून आतापर्यंत बँक नफ्यात असून तिला अ वर्गाचा दर्जा मिळालेला आहे अशी माहिती सीईओ अतुल खिरवडकर यांनी दिली. हि सहकारी बँक असून इतर सहकारी बँकांना कायम सहकार्य करत असते. पुढील वर्षात गुजरात आणि महाराष्ट्रा अधिक शाखा सुरु करण्याचा आमचा मानस असल्यचे देखील त्यांनी सांगितले.
कल्याण जनता सहकारी बँके आणि ट्रस्टच्या माध्यमातून वनीकरण केले जाते. बँक दरवर्षी नफ्यातील १% रक्कम धर्मदाय निधीसाठी काढून व तिचा विनीयोग वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील काम करणा-या विविध संस्थांना निधी रुपाने देऊ केले जाते. तसेच कोरोना काळातील “कोव्हिड – १९ रिलीफ” कर्ज योजनेमुळे अनेकांना आपला व्यवसाय सुरळीतपणे चालू ठेवता आला असल्याची माहिती अध्यक्ष सचिन आंबेकर यांनी दिली.
ग्राहकांना नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, मेसेज सुविधा इ. अद्ययावत तांत्रिक सेवा बँक देत आहे. त्याचबरोबर भविष्यात बँके तर्फे क्रेडीट कार्डची सुविधा पुरवण्यासाठी बँक प्रयत्न करणार आहे. बँक दरवर्षी बँकेच्या स्थापनेपासून बँकेचे संचालक सभाभत्ता स्वतःसाठी न घेता “संचालक समाजसेवा पुरस्कार निधी’ न्यास येथे जमा करतात. या न्यासाच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदत केली जाते. ५० वर्षाच्या कालावधीत बँकेस अनेक नामवंत संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी सन २०१३ – १४ करीता कोकण विभागातील नागरी सहकारी बँकांच्या गटात महाराष्ट्र राज्य सरकार यांचेकडून मिळालेला ‘सहकार भूषण पुरस्कार हा बँकेच्या निस्वार्थी कामास मिळालेली पावतीच आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध योजना सुरु करण्याचा बँकेचा मानस आहे.



