Views: 472
कल्याण : महाराष्ट्रात सोलापूर आणि शिर्डी येथे वंदे भारत एक्सप्रेस प्रथमतः सोडण्यात आली आहे. हि तीर्थस्थळांच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट सुविधा रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसच्या रुपाने उपलब्ध करुन दिल्याने प्रवाशांचा या एक्सप्रेसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंह यांनी कल्याण येथे दिली.
मुंबई-साईनगर (शिर्डी) वंदे भारत एक्सप्रेसची ऑगस्ट पर्यंतची नोंदणी प्रवाशांनी करुन ठेवली आहे. आता या एक्सप्रेससाठी प्रवाशांची प्रतीक्षा यादी सुरू झाली आहे. प्रवाशांच्या या नोंदणीवरुन साईनगर एक्सप्रेसला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात येतो. दररोज साईनगर, सोलापूरकडे जाणाऱ्या वंदे भारतला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.
कल्याण रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेसला थांबा हवा असेल तर तशी मागणी प्रवाशांकडून होणे आवश्यक आहे. हा निर्णय धोरणात्मक असल्याने याविषयी रेल्वे मंड़ळ निर्णय घेते, असे डॉ. सिंह यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. रेल्वे प्रवासी संघटना, सामाजिक कार्यकर्ते भरत उबाळे, कल्याण मधील मनसेचे रुपेश भोईर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे साईनगर एक्सप्रेसला कल्याण, आसनगाव, कसारा स्थानकात थांबा देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस मुंबईहून सकाळी ६.२० ला निघून ते साईनगर शिर्डी येथे ११.४० वा. पोहोचते. हि एक्स्प्रेस दररोज ५ तास २० मिनिटात ३४३ किमीचे अंतर कापते. तर सोलापूर एक्सप्रेस मुंबईहून संध्याकाळी ४.०५ मी निघून सोलापूर येथे रात्री २२.४० मी पोहोचते. या प्रवासादरम्यान ती ६ तास ३० मिनिटात दररोज ४५५ किमी अंतर पार करते.



