Views: 539
कल्याण : कल्याण मधील एका महाविद्यालयात गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना हिंदीत बोलायला सांगणाऱ्या मुख्याध्यापिकेला मनसैनिकांनी चांगलेच सुनावत मुख्याध्यापिकेच्या कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी मुख्याध्यापिकेने उपस्थित मनसैनिक आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने माफीनामा लिहून दिल्यानंतर या वादावर पडदा पडला.
सोमवारी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी कल्याण पश्चिमेतील के. एम. अग्रवाल कॉलेजमध्ये मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा उर्मिला तांबे, शाखाध्यक्ष कपिल पवार, गणेश लांडगे यांच्यासह इतर पदाधिकारी गेले असता तेथील मुख्याध्यापिका मन्ना यांच्याकडून हिंदी बोलो, हिंदी राष्ट्रभाषा आहे असे सांगण्यात आले. हे ऐकून उपस्थित मनसे पदाधिकारी संतप्त होत तेथेच खाली बसले. मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
त्यानंतर मुख्याध्यापिका मन्ना यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच मराठी बांधवांची माफी मागितली व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने लेखी माफीनामा देखील दिला. विद्यार्थ्यांचा विषय देखील मार्गी लावण्यात आला असल्याची माहिती कपिल पवार यांनी दिली.



