Views: 756
कल्याण : कोरोना नियमांचे निर्बंध उठविल्यानंतर मंगळवारी आगंरकी चतुर्थी निमित्ताने टिटवाळा महागणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची टिटवाळ्यात मांदियाळी झाली होती.
गेली दीड वर्षभर कोरोना महामारीचे सावट सर्वत्र असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक संस्थांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये यासाठी आवाहन करण्यात आल्यानंतर काही काळ मंदिर, देवस्थाने बंद ठेवण्यात आली होती. त्यानुसार सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्तांनी येथील मंदिर शासनाचा आदेश येईपर्यंत मंदिर हे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. परंतु राज्य सरकारने कोरोना नियमावली च्या निर्बंधाची बंदी उठल्यानंतर आलेल्या मंगळवारी च्या आगंरकी चतुर्थीला चाळीस हजार हुन अधिक गणेशभक्तांनी महागणती दर्शनाचा लाभ घेतला.
सलग आलेल्या गत आठवड्यातील सुट्यामुळे येत्या आठवड्यातील कामाचा दुसरा दिवस असल्याने चाकरमान्यांची काहीशी तुरळक गर्दी होती. मात्र मंगळवारी आलेल्या आगंरकी चतुर्थीच्या योगामुळे महागणपती मंदिरात भक्तांचा महासागर लोटल्याचे पहायला मिळाले.
कोरोनाच्या नैराश्याने ग्रासलेल्या काळातून आगंरकी चतुर्थी निमित्ताने बाप्पाच्या आशीर्वादाने उभारी मिळावी असा संकल्प करत नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी मंगळवारी टिटवाळा येथील महागणपती मंदिरात अनेक गणेश भक्तांनी आज आपल्या लाडक्या गणरायाला साकडे घालण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पहाटे ४ वाजता अभिषेक, आरती संपन्न झाल्यावर मंदिर बारी दर्शनासाठी खुली करण्यात आली होती. गणेश भक्तांची गर्दी हळूहळू वाढत असताना फुल विक्रते, दुकानदार यांच्या चेहऱ्यावर समाधान पाह्यला मिळाले. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या संचार बंदीचा फटका येथील मंदिरावर अवलंबून असलेले फुलविक्रते, मोठे छोटे व्यापारी, काम करणारे कामगार, दुकानदार, फेरीवाले, रिक्षाचालक व एकमेकांवर अवलंबून असणारे उद्योगधंदे यांचे अतोनात नुकसान व हाल झाले. मात्र चतुर्थी निमित्त झालेल्या भक्तगणांच्या गर्दीमुळे या सगळ्यांमध्ये एक नवचैतन्य दिसून आले.
सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्याचे मंदिर प्रशासनाचे सुभाष जोशी यांनी सांगत भाविकासाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या चे वाटप करण्यात आले. अनिरुध्द बापूचे १०० स्वयंसेवक दोन पाळीमध्ये भक्तांना रांगेत दर्शन मिळण्यासाठी तैनात होते. टिटवाळा पोलीस स्टेशनचे २५ पोलीस, ४० होमगार्ड देखील तैनात होते. वाहतुकीच्या दृष्टीने उपयायोजना करण्यात आल्या होत्या. असे असले तरी आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक मात्र समाधानी चेहऱ्याने घरी परतताना चे चित्र आगंरकी चतुर्थी निमित्ताने टिटवाळ्यात दिसत होते.



