Views: 576
कल्याण : माथाडी कामगारांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी पुकारलेल्या माथाडी कामगारांच्या लाक्षणिक संपात कल्याण मधील माथाडी कामगार संघटनेनेतील कामगार देखील सहभागी झाले होते. सकाळ पासून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे उपाध्यक्ष शंकरराव आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांनी संप पुकारण्यात आला. यावेळी शंकरराव आव्हाड यांच्यासह हेमंत सानप, मधुकर फड, नवनाथ सानप, शरद वाघ आदी पदाधिकारी आणि इतर माथाडी कामगारांनी जोरदार निदर्शने केली.
कल्याण शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी बाजार समिती आहे. याठिकाणी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून भाजीपाला, धान्य आणि फुलांच्या गाड्या येत असतात. आलेल्या भाजीपाल्याच्या गाड्या रिकाम्या करण्यासाठी माथाडी कामगारांची मोठी भूमिका असते. आजचा संप हा लाक्षणिक संप असून तब्बल दोन ते अडीज हजार कामगार एकट्या कल्याणात आहेत.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष केले आहे. संप, आंदोलने, बैठका झाल्या परंतु माथाडी कामगरांचे प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला असून कामगारांनी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला. माथाडी कामगारांच्या शासनाच्या विविध विभागाअंतर्गत असलेल्या न्याय प्रश्नांची सोडवण्यासाठी तातडीने लक्ष दिले जावे, अन्यथा माथाडी कामगारांना तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेणे भाग पडेल, असा इशाराही माथाडी कामगारानी दिला.
दिवसागणिक बाजार समिती मध्ये भाजी आणि धान्याच्या लहान मोठ्या गाड्या मिळून जवळपास ३०० ते ३२५ गाड्या येत असतात. मात्र संप असल्याने गाड्या यातील ३० ते ४० टक्के गाड्या आल्या आहेत. त्यातील भाजीच्या गाड्या खाली झाल्या. मात्र कांदा बटाटा आणि धान्याच्या गाड्या तशाच उभ्या आहेत. अशी माहिती बाजार समितीचे निवृत्ती चकोर यांनी दिली.



