Views: 386
कल्याण : १५ ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून “हर घर तिरंगा” हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकावून उत्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलतांना केले. यावेळी त्यांनी केडीएमसी क्षेत्रात २ लाख १० हजार तिरंगा फडकविण्याचा मानस पालिका आयुक्तांनी व्यक्त केला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, महापालिका सचिव संजय जाधव उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारतींवर तसेच नागरिकांनी देखील स्वयंस्फुर्तीने स्वत:च्या घरावर, ध्वज संहितेचे पालन करुन राष्ट्रध्वज उभारणे अपेक्षित असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दयावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महापालिका क्षेत्रात सुमारे २ लाख ९० हजार मालमत्ता असून शासनाकडून २ लाख १० हजार झेंडयांची मागणी आता करण्यात आलेली आहे. हे झेंडे सशुल्क किंमतीत उपलब्ध होणार असून प्रत्येक प्रभागात महापालिकेचे विक्री केंद्र असेल, त्याचप्रमाणे महापालिकेमार्फत बुथ लेव्हल स्वंयसेवकांची नियुक्ती झेंडे वितरणासाठी करण्यात येत आहे, अशीही माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.
मनपा परिसरातील सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी तसेच घ्वज संहितेचे पालन करुन झेंडा लावणे तसेच झेंडयाचा सन्मान ठेवणे ही माहिती सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी विविध सामाजिक संघटनांची बैठकही महापालिकेमार्फत आयोजित करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.


