Views: 433
कल्याण : संपुर्ण राज्यात गोवरचा उद्रेक झाला असून गोवरच्या रुग्णांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होतांना दिसून येत आहे. गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका देखील सज्ज झाली आहे. यासाठी ज्या बालकांचे गोवर – रुबेला लसीकरण झाले नसेल त्यांचे लसीकरण करुन घेणे आवश्यक असून लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांमध्ये गोवरचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. गोवर हा विषाणूपासून होणार आजार आहे. गोवर विषाणू, रुग्णांचा खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे ही गोवरची लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणुंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. सुरुवातीला ताप, खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. दोन – चार दिवसानंतर सर्व अंगावर तसेच कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पुरळ पसरते. गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अ – जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते. अ जीवनसत्व कमी झाल्याने रुग्णाला डोळयांचे आजार व अतिसार न्युमोनिया, मेंदुज्वर, असे आजार होऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ-जीवनसत्वाची मात्रा दिल्यास हे आजार होण्याची शक्यता कमी असते.
गोवर रोग टाळण्यासाठी लसीकरण हा प्रभावी मार्ग असून महापालिका रुग्णालयांमध्ये व सर्व नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल. त्यामुळे ज्या बालकांचे गोवर – रुबेला लसीकरण झाले नसेल त्यांचे लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. तरी या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व काळजी घ्यावी तसेच आपल्या ९ महिने ते ५ वर्ष बालकांचे गोवर लसीकरण करुन घेवून आपल्या बालकांचे संरक्षण करावे असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माता व बाल संगोपन आरोग्य अधिकारी गणेश डोईफोडे यांनी केले.



