Views: 499
कल्याण : पर्यावरण दक्षता मंडळ ही स्वयंसेवी संस्था गेली २४ वर्षे ठाणे शहरात पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि प्रबोधनाचे कार्य करीत आहे. पाणथळ जागांविषयी संशोधक, विद्यार्थी, स्थानिक नागरिक व मच्छीमार समाज इ. वर्गामध्ये गेली २४ वर्षे पर्यावरण दक्षता मंडळ “स्वच्छ खाडी अभियान” राबविते. या अभियानाच्या अंतर्गत दरवर्षी २ फेब्रुवारी या दिवशी जागतिक पाणथळ भूमी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येते.
मानवी हस्तेक्षेपामुळे होणारा खाडीचा ह्रास, पाणथळ भूमीचे महत्व आणि खाडीतील जैवविविधतेचे संवर्धन अधोरेखित व्हावे या उद्देशाने पर्यावरण दक्षता मंडळ, मुंबई विद्यापीठ, एनव्हीरो-व्हिजिल आणि असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण दक्षता मंडळाकडून आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेचे हे १८ वर्ष असून विविध कार्यक्रमांचे व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. रामसर सचिवालयाने जाहीर केलेल्या “मानवी कल्याणासाठी पाणथळ भूमी” या संकल्पनेच्या अनुषंगाने हि परिषद घेण्यात आली.
२ फेब्रुवारी रोजी मुंबई विद्यापठाच्या विद्यानगरी संकुलात ग्रीन नॅनोटेकनॉलॉजी ऑडिटोरियम येथे या परिषदेला सुरुवात झाली. यावेळी या उदघाटनाच्या कार्यक्रमाला पर्यावरण दक्षता मंडळ अध्यक्ष डॉ. मानसी जोशी, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद कर्णिक, डॉ. नंदकुमार जोशी, मुंबई विद्यापीठ शास्त्र शाखेचे प्रमुख डॉ. शिवराम गर्जे, ए.टी.बी.एस. अध्यक्ष डॉ. मदन चतुर्वेदी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्घाटन सत्रात भूगोल विभागप्रमुख डॉ. अपर्णा फडके यांनी मुंबई विद्यापीठाबाबत थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर डॉ. मानसी जोशी यांनी पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रकल्प पर्यावरण शाळा, खुली पर्यावरण शाळा, ग्रीन लिविंग कन्सल्टन्सी, ग्रीन लवर्स क्लब, देवराई, निसर्गयान याबद्दलची माहिती दिली.
त्यानंतर डॉ. प्रसाद कर्णिक यांनी आजच्या परिषदेचे महत्व विषेद केले. त्याचबरोबर स्वच्छ खाडी अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण दक्षता मंडळ गेल्या अनेक वर्ष ठाणे खाडी चा शास्त्रीय अभ्यास करत आहे. त्या अभ्यासाचा शास्त्रीय आढावा त्यांनी आपल्या सादरीकरणातून मांडला. पाणथळ जागा ही वेगळी परिसंस्था आहे. या जागांची जोपासना करण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक जीवनशैली प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे असं त्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं.


