Views: 340
कल्याण : ‘येत्या पंचवीस वर्षांत विकसित भारत’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प साकारण्यासाठी पथदर्शी आराखडा दर्शवणारा अर्थसंकल्प असून विकासाच्या दिशेने वेगाने मार्गाक्रमणाची हमी देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. यामध्ये देशातील शेतकरी, गरीब, महिला शक्ती आणि युवाशक्तीच्या प्रगतीचे प्रतिबिंब उमटले आहे, अशा शब्दांत भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी यांनी केंद्र सरकारच्या २०२४-२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
महिला युवक, गरीब आणि शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी समर्पित असलेल्या या विकसित भारत अर्थसंकल्पाने देशाचे भवितव्य घडविणाऱ्या या चार वर्गांच्या कल्याणासाठी नव्या संधी आणल्या आहेत, असेही सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
एक कोटी घऱांच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसवून गोरगरीबांची घरे उजळणारी ‘सूर्योदय योजना’ पंतप्रधानांचा दृष्टीकोन प्रतिबिंबित करत असून याद्वारे होणाऱ्या वीजनिर्मितीमुळे गोरगरीबांच्या खर्चात वर्षाला १५ हजार ते १८ हजार रुपयांची बचत होणार असल्याचे सुर्यवंशी यांनी म्हटले आहे. आयुष्मान भारत योजनेद्वारे पंतप्रधानांनी आतापर्यंत ३० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येस पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार पुरवले आहेत. आयुष्मान योजनेशी आशा सेविका, आंगणवाडी सेविका आणि सहाय्यक यांना जोडण्याचा महत्वाचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आल्याने या वर्गालाही मोफत उपचाराचा लाभ घेता येईल.
रोजगारक्षम वर्गात महिलांचा वाढता सहभाग, तिहेरी तलाक प्रथा रद्द करून महिलांच्या आत्मसन्मानाची जपणूक, लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांसाठी एकतृतीयांश आरक्षण, पीएम आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भारतातील सत्तर टक्क्यांहून अधिक घरांच्या मालकी हक्कात महिलांचा एकत्रित किंवा स्वतंत्र वाटा, अशा निर्णयांतून मोदी सरकारने भविष्यातील विकासाचा अग्रक्रम स्पष्ट केला आहे. गरीब, शेतकरी, युवक आणि महिला हे विकसित भारताचे चार आधारस्तंभ असून त्यांच्या विकासाची मोदी सरकारची नीती परिवर्तनाचे नवे पर्व निर्माण करेल, असा विश्वासही अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.



