Views: 627
कल्याण : परंपरेप्रमाणे सेंट मेरीज शाळेत यावर्षीही हरिनामाचा गजर दुमदुमला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेत वारी आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या प्राचार्या दिव्या बोरसे व सी.ई.ओ. डॉ. विंदा भुस्कुटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षकवृंद यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. संपूर्ण शाळेला भक्तिमय स्वरूप आले होते. आषाढी एकादशी या पारंपरिक उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यात आली होती.
‘प्रत्येक पाऊल,प्रत्येक पायरी।
प्लस्टिक प्रदूषणाचा नाश करी।।
पर्यावरण संवर्धन रुजवू घरी दारी।
आषाढी एकादशी हि सकळ जणांची वारी’।
हरिनामाचा गजर गाउनी
हरितक्रांतीचा वसा घेऊ शिरी।।
असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, विठ्ठलनामाचा गजर करीत वारी पोहोचली. आर्य ग्लोबल संस्थेच्या अंबरनाथ येथील आर्य गुरुकुल या शाळेत सर्व बाल वारकऱ्यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले. शाळेत पोहचताच विद्यार्थ्यांनी लेझीम, रिंगण, फुगडी यासारखे पारंपरिक कार्यक्रम हरिनामाच्या जयघोषात सादर केले. हे सर्वच कार्यक्रम सादर करताना विज्ञानाशी सांगड घालण्यात आली होती. तसेच या आषाढी वारीला शाळेच्या गाणंवृंदाने साथ देऊन आणखीनच कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सेंट मेरीज शाळेसोबतच संस्थेच्या आर्य गुरुकुल व मॉडर्न हायस्कूल या शाळांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे आर्य गुरुकुल शाळेचे प्राचार्य निलेश राठोड यांनी प्रसंगी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. अशा या जल्लोषात उत्साहवर्धक वातावरणात आर्य ग्लोबलाचे चेअरमन भरत मलिक आणि विशिष्ट वळणाने शाळा पुढे नेऊ पाहणाऱ्या शाळेच्या डायरेक्टर डॉ. निलम मलिक यांच्या उपस्थितीने वारीत वेगळीच रंगत आली. एकता, पर्यावरण संवर्धन, सहकार्य, समन्वय, आध्यत्मिक अशा अनेक गुणांची रुजवणूक करणाऱ्या या वारीची सांगता प्रसाद वाटप व हरिनामाचा जयघोष करून करण्यात आली.



