निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृती शिल्पाचे लोकार्पण

Views: 635
शेअर करा:

महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व संत निरंकारी मंडळाचे महासचिव सुखदेवसिंहजी यांच्या हस्ते झाले लोकार्पण

कल्याण : संत निरंकारी मिशनचे तत्कालीन प्रमुख निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृती शिल्पाचे नुकतेच नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि संत निरंकारी मंडळाचे महासचिव सुखदेवसिंहजी यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.

      या प्रसंगी खासदार राजन विचारे, संत निरंकारी मंडळाचे महाराष्ट्र व दक्षिणी राज्यांचे प्रभारी मोहन छाब्रा आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक माजी नगरसेवक, स्थानिक नागरीक आणि संत निरंकारी मंडळाचे अनेक प्रबंधक व शेकडो अनुयायी या लोकार्पण सोहळ्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

      नवी मुंबई महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पुढाकार घेऊन निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या पटनी मैदानावर सन २००५ ते २०१३ अशी ९ वर्षे झालेल्या महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागमातून प्रसारित झालेल्या दिव्य मार्गदर्शनाच्या स्मृती कायम टिकून राहाव्यात या हेतुने संत निरंकारी मिशनचे भक्तगण व सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकभावनेचा आदर करुन पटनी मैदानालगत पटनी रोड जिथे ठाणे-बेलापूर रोडला येऊन मिळतो तिथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हे प्रेरणादायक स्मृती शिल्प उभारण्यात आले आहे.

      लोकार्पण सोहळ्यामध्ये मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे म्हणाले, की निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी समाज व मानवतेच्या कल्याणासाठी अलौकिक असे कार्य केले आहे. मानवमात्राला सत्य, प्रेम व एकत्वाचा संदेश दिला देऊन जगामध्ये शाती, समता व बंधुत्वाचे वातावरण निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. या शिल्पावर अंकित करण्यात आलेला ‘सत्य, प्रेम व एकत्व’ हा संदेश जनसामान्यांना मानवतेसाठी सतत प्रेरणादायी ठरेल. बाबा हरदेवसिंहजी यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय स्वरुपाच्या पुरस्कारांचाही शिंदे यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.

      संत निरंकारी मिशनच्या वतीने दिल्लीहून आलेले सुखदेवसिंहजी, महासचिव, संत निरंकारी मंडळ यांनी या प्रसंगी बाबाजींनी मानवतेसाठी दिलेल्या असाधारण योगदानांचे स्मरण करुन दिले.

      ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले, की बाबाजींच्या अलौकिक कार्याने केवळ नवी मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश-विदेशात समाजाच्या सर्व थरांतील लोकांवर प्रभाव टाकला आहे. आध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान कौतुकास्पद आहे. बाबाजींचे हे महान कार्य आपण पुढे घेऊन जायला हवे, असेही ते म्हणाले.

      यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्ष नेते विजयजी चौगुले यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, की बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या पटनी मैदानावरील तब्बल ९ वर्षांच्या निरंकारी संत समागमाच्या श्रृंखलेतून जो दिव्य संदेश प्रसारित झाला त्याचा खोल ठसा जनमानसावर उमटलेला आहे. ही ऐतिहासिक बाब असून हा दैदिप्यमान इतिहास लुप्त होऊ नये आणि त्यांच्या नवी मुंबईतील महान कार्याची आठवण कायम राहावी यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या स्मृती शिल्पाची निर्मिती करण्यात आली आहे.

      संत निरंकारी मंडळाचे नवी मुंबईचे सेक्टर संयोजक मनोहर सावंत व इतर प्रबंधकांनी या या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. लोकार्पण सोहळ्यामध्ये मंडळाचे स्थानिक मुखी सोमनाथ माने यांनी आभार व्यक्त केले.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत