Views: 388
कल्याण : येत्या ८ दिवसांत खड्डे भरण्याची कामे प्राधान्याने पुर्ण करावीत असे निर्देश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले. केडीएमसी अधिकारी त्याचप्रमाणे पोलीस, आर.टी.ओ., वाहतुक शाखा, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी शासकीय यंत्रणांसमवेत महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मंगळवारी संपन्न झालेल्या मान्सुनपूर्व आढावा बैठकीत बोलताना त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, शहर अभियंता अर्जुन अहिरे व इतर खाते, विभाग प्रमुख उपस्थित होते.
पावसाळ्यात नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी पुढील ८ दिवसांत खड्डे भरण्याची कामे सर्व संबंधित यंत्रणांनी पुर्ण करावीत आणि शक्य तो ही कामे रात्रीच्या वेळेत करण्यात यावीत असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. अतिधोकादायक इमारती निष्कासीत करण्याची कारवाई त्वरित करावी, रहिवासमुक्त अतिधोकादायक इमारती आधी निष्कासीत कराव्यात, एमएसइडीसीएलने अतिधोकादायक इमारतींमधील वीज यंत्रणा खंडीत करण्याची कारवाई करावी जेणेकरुन सदर इमारतींच्या निष्कासनाची कारवाई लगेच करता येईल असे ते पुढे म्हणाले.
महापालिकेमार्फत रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणे, नाले सफाईची कामे सुरु असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. संपूर्ण पावसाळ्याच्या कालावधीत सगळ्या रस्त्यांवरील डेब्रीज उचलण्यासाठी सर्व यंत्रणांनी येत्या ३ दिवसांत आढावा घ्यावा अशी सुचना शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी आज सर्व संबंधितांना केली.
साथरोगाचा उद्रेक टाळण्यासाठी कंस्ट्रक्शन साईटवर अँटी लारवा ॲक्टीव्हिटी करावी लागते. याकरिता सर्व प्रभागाच्या सहा. आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर ही कार्यवाही करण्यासाठी सहकार्य करावे अशा सुचना साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी या बैठकीत दिल्या. लोकप्रतिनिधींच्या, नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी, अचानक उद्भवलेल्या अडचणी निवारणासाठी सर्व संस्थाच्या एजन्सी व त्यांचे प्रतिनिधी सर्व संबंधीत रस्त्यावरील साईट ऑफीसला उपलब्ध ठेवावेत. त्या रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी भरावेत अशा सूचना शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी या बैठकीत दिल्या.



