Views: 401
कल्याण : माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२३ आणि शहर सौंदर्यीकरण अभियानांतर्गत महानगरपालिका अनेकतम नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिवसभरात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता अधिकारी जगताप आणि इतर कर्मचारी, पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले आणि त्यांचे सहकारी तसेच निर्मल युथ फाऊंडेशन, ऊर्जा फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि प्रगती कॉलेजचे एनएसएसचे विद्यार्थी यांनी मिळून आयरेगाव तलाव येथे स्वच्छता अभियान राबविले.
का यामध्ये आयरेगाव तलाव व आजूबाजूच्या परिसरातील निर्माल्य, नारळाच्या करवंट्या, मातीची भांडी प्लास्टिक, थर्माकोल, चपला, तुटलेल्या बॅग्स इत्यादी सामग्री (कचरा) या एनजीओजचे प्रतिनिधी व विद्यार्थी यांचे मार्फत संकलित करण्यात आला आणि तदनंतर यातील ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करण्यात आले. यामध्ये सुमारे १०० किलो ओला कचरा आणि ५० किलो सुका कचरा आढळून आला. ओला कचरा उंबर्डे येथील प्लांटवर पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला.
तलावाबाजूचा चालण्याचा रस्ता (वॉकिंग ट्रॅक) देखील यावेळी साफ करण्यात आला. यासाठी लागलेली सर्व सामुग्री महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पुरविण्यात आली. तलावाची साफसफाई करत असताना मासे, कासव ,विविध प्रकारचे पक्षी अशी जैवविविधता या परिसरात आढळून आली.



