Views: 603
अतिधोकादायक झालेली झाडे तोडली जात नसल्याने मोहन उगले आक्रमक
कल्याण : अतिधोकादायक झालेली झाडे तोडली जात नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी आक्रमक होत केडीएमसीचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला.
सध्या पावसाचे दिवस असल्याने झाडे पडण्याची, फांद्या तुटण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून वाढलेल्या फांद्या अथवा धोकादायक झाडे तोडण्यासाठी कल्याण पश्चिमेतील 21, 22, 28, 29 या प्रभागातील नागरिकांच्या अनेक तक्रारी या उगले यांच्याकडे येत असतात. नागरिकांच्या तक्रारींनुसार मोहन उगले यांनी हि झाडे तोडण्यासाठी आणि फांद्या छाटण्यासाठी महापालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने आज मोहन उगले यांनी आज उद्यान आधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला.
उद्यान विभागाकडे 20 कोटी रुपये निधी असून देखील हि झाडे तोडण्यासाठी अथवा फांद्या छाटण्यासाठी केडीएमसी कारवाई करत नाही. एखादे झाड तोडण्यासाठी कामगार पाठवल्यास पुन्हा त्यांना दुसऱ्या प्रभागात पाठवले जाते. यामुळे अर्धवट फांद्या छाटुन हे कामगार दुसरीकडे जात असल्याने पावसाळ्यात झाड पडून एखादी दुर्घटना झाल्यास त्याला जवाबदार कोण असेल असा सवाल उगले यांनी करत केडीएमसीचे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या दालना बाहेर ठिय्या मांडला.
यावेळी येत्या दोन दिवसांत प्रभाग क्रमांक 21, 22, 28, 29 या प्रभागातील झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी आणि अतिधोकादायक झालेली झाडे तोडण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करून दिली जातील असे आश्वासन केडीएमसीचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिले असल्याची माहिती उगले यांनी दिली.



