Views: 664
कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार आज हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून कल्याणात मनसैनिकांकडून महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, उपशहराध्यक्ष गणेश चौधरी, मनविसे शहर अध्यक्ष विनोद केणे, शहर संघटक रुपेश भोईर, रोहन आक्केवार, सचिन पोपलाईतकर, कपिल पवार, नैना भोईर, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुंबई आणि ठाण्यात झालेल्या सभांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यात झालेल्या सभेमध्ये त्यांनी येत्या ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्याचे अल्टीमेटम दिले. तसेच हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून कल्याणात मनसेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदीरात महा आरती आणि हनुमानचालीसा पठण करण्यात आले. यावेळी जय श्रीराम, जय हनुमानची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्वत्र मनसैनिकांनी हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले असून कल्याणमध्ये देखील त्यानुसार हनुमान मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मशिदीवरील भोंगे न उतरविल्यास मशिदीच्या समोर हनुमान चालीसा पठण करणार आहोत. आपले सण अशाचप्रकारे साजरे करून हिंदुत्व जपणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार प्रकाश भोईर यांनी दिली.
तर राज्य सरकारने ३ मे पर्यंत मशिदींवरील अनधिकृत भोंगे न उतरल्यास आम्ही मशिदीबाहेर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करू, सरकारने विसरू नये की टायगर अभी जिंदा है अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी व्यक्त केली.



