Views: 816
वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणून बेकायदेशीर धंदे बंद करण्याची केली मागणी
कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रोज होणारी वाहतूक कोंडी हा जिकरीचा विषय झाला असून या वाहतूक कोंडीने कल्याणकर नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणून बेकायदेशीर धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. यावेळी बैठकीला वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त, पोलिस उपायुक्त, आरटीओ अधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रतीक पेणकर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आयुक्तांनी या वाहतूक कोंडीवर संबंधित सर्व विभागांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेले काम गेले दोन ते तीन वर्षापासून अतिशय संथ गतीने सुरू आहे. यामुळे दररोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या लाखो कल्याणकरांना या सगळ्या परिस्थितीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रिक्षा चालक टॅक्सी व इतर वाहनांचा वाहतूक शाखेकडून नियंत्रण नसल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी खूप अडथळे निर्माण होत आहेत. त्याचबरोबर स्काय वॉक तसेच स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण बेकायदेशीर धंदे व अश्लील कृत्य यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना असुरक्षित वाटते. यावर योग्य ती कठोर कारवाई करून कल्याण स्टेशन परिसर नागरिकांसाठी मोकळा करून द्यावा अशी मागणी आयुक्तांकडे केली असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली.


